६ नोव्हेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
काळ्या पैशांची पॅराडाईज पेपर्स नावाची यादी
जर्मनीतील
'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं
काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. या वृत्तपत्रानं
'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याच
वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा
खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे
बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते. 'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा
समावेश आहे. यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या
नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या
क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड
अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा
राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.
___________________________________
निर्मला सीतारमन यांच्या दौऱ्याला चीनचा आक्षेप
सुरक्षा मंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशच्या विवादित क्षेत्राचा दौरा केल्यानंतर चीनने त्यावर आक्षेप घेतला आहे. सीतारमन यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशच्या सुदूर अंजा जिल्ह्याचा दौरा केला होता. हा जिल्हा चीनच्या सीमेलगत आहे. भारताच्या सुरक्षामंत्र्यांनी शांतीसाठी या विवादित भागाचा दौरा करणे अनुकूल नाही, असे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चुनयिंग यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले, 'चीन आणि भारतामध्ये अरुणाचलच्या संबंधित प्रदेशावरुन वाद आहे. अशातच शांतीसाठी सुरक्षामंत्र्यांचा दौरा अनुकूल नाही. या दौर्यामुळे विवादित भागात अस्थिरता निर्माण होऊ शकते. शांतीसाठी दोन्ही देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे.' सीतारमन यांच्यासोबत जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा आणि लष्कराचे इतर वरीष्ठ अधिकारी होते. यावेळी सीतारमण यांनी जवानांशी चर्चा करुन सीमेलगतच्या परिस्थितीचा आढावाही घेतला.
______________________________
२०१९ मध्ये शरद पवार होऊ शकतात पंतप्रधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर कर्जतमध्ये सुरू असून या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल येत्या काळात शरद पवार देशाचं पंतप्रधान होणे अशक्य नसल्याचे आश्वासक विधान केले आहे. भाजपसाठी यंदाची गुजरात विधानसभा निवडणुक कठीण झाल्याचे वक्तव्यही प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. नरेंद्र मोदींवर याच सभेत प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार हल्ला केला. नोटबंदी, जीएसटीमुळे देशातील वातावरण बदलले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. भाजपची परिस्थिती गुजरातमध्ये कठीण होऊन बसली आहे. देशात एकेकाळी मोदींची लाट होती, पण तसे चित्र आता राहिलेले नाही, असे पटेल म्हणाले. तसेच शरद पवार आणि नरेंद्र मोदींची तुलना केली असता शेतकरी शरद पवारांना प्राधान्य देतील असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच गुजरात मॉडेल राज्य म्हणून दाखवतात पण त्याच गुजरातमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे तसेच राष्ट्रवादीला पुढच्या काळात भरपूर मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या शिबिरात उद्या शरद पवारांचे भाषण होणार आहे. राष्ट्रवादीतील मरगळ या शिबिरामुळे तरी झटकली जाईल, अशी आशा पक्ष नेतृत्वाला आहे.
____________________________
जातीयवाद असेपर्यंत आरक्षणाची गरज : मोहन भागवत
सार्या जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम आहे. या सक्षमीकरणामुळेच भारताकडे जगाचे लक्ष लागले आहे, मात्र जातीयवादामुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशामधील जातीयवाद जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आरक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. रविवारी जयपूरमध्ये झालेल्या स्वर गोविंदम व सेवा भारती भवनचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू म्हणजे जीवन जगण्याची एक पध्दत असून, हिंदू शब्दामध्ये सर्व समाजाला एक करण्याचे सामर्थ्य आहे. हिंदू या शब्दाने ओळखला जाणारा देश म्हणजे अखंड भारत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वर गोविंमविषयी बोलताना त्यांनी शास्त्रीय संगीत म्हणजे सत्य आणि करुणा यांच्याकडे घेऊन जाणारा मार्ग असल्याचे सांगत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले.
साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास विरोध
शिर्डीतील साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास साईभक्तांचा विरोध आहे. साईंच्या पादुका बाहेर जाव्यात की नाही, या बाबत ग्रामस्थांनी साईंच्या समाधीवर चिठ्ठी टात कैल घेतलाय त्यातही पादुका बाहेर जावु नये असाच कैल आलं आहे. मात्र दुसरीकडे साईबाबा संस्थान आज चेन्नईला पादुका नण्याची तयारी करतं आहे. या निर्णयाविरोधात शिर्डीतील छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलंय. मात्र दुसरीकडे चेन्नई येथील भक्तांना दिलेला शब्द पाळवा लागणार असल्याने साई संस्थानच प्रशासन मात्र संभ्रमात पडलंय. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षा-निमित्ताने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईच्या पादुकांचा देशभर दौरा आयोजीत केलाय, त्यासाठी मोठा खर्च ही केला जात आहे. देशातील गोवा आणि दिल्ली राज्यात पादुकांचा दर्शन सोहळा झाला आहे, मात्रा साई संस्थान साईंच्या पादुका शिर्ड बाहेर नेत असल्याने शिर्डीतील ग्रामस्थां नाराजी होती. ग्रामस्थांचा पादुका बाहेर नेण्यास विरोध वाढत गेला आणि 6 नोहेंबर रोजी साईच्या पादुकांचा नियोजित चेन्नई दौरा रद्द करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. मात्र यावर साई संस्थानने कोणताही निर्णय न घेतल्याने, शिर्डीतील छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यानी रविवारी शिर्डीत एक निषेध फेरी काढत मारुती मंदीराजवळील जागेत बसत उपोषणास सुरवात केली आहे.



